बेळगाव लाईव्ह: जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी जंगलांचे संवर्धन अत्यंत आवश्यक असून, प्रत्येकाने वृक्षारोपण व वनसंवर्धनात सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज आहे. जंगल वाचवले तरच सुरक्षित आणि समृद्ध भविष्य मानवाला मिळू शकते, असे प्रतिपादन सरकारी सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले यांनी केले.
जागतिक वन दिनाच्या निमित्ताने बेळगाव गार्डनर्स क्लबच्या वतीने ठळकवाडी क्लब, टिळकवाडी येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. “मारुती चितमपल्ली : निसर्ग, जैवविविधता” या विषयावर त्यांनी सखोल विवेचन करत उपस्थित निसर्गप्रेमींना ज्ञानाची समृद्ध पर्वणी दिली.
कार्यक्रमास गार्डनर्स क्लबच्या अध्यक्षा रोहिणी गणपुले, उपाध्यक्ष दीपा भट तसेच कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख श्रुती हुदली यांनी करून दिली. रोहिणी गणपुले यांनी रोप देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
आपल्या प्रभावी भाषणात चौगुले यांनी जंगलाचे मानवी जीवनाशी असलेले अतूट नाते अधोरेखित करत विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतींचे पर्यावरणीय संतुलनातील महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी जंगल हे केवळ संसाधन नसून जीवनाचा आधार असल्याचे सांगितले.





