बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज ‘सिटीस २.०’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी पालिकेचा २० टक्के हिस्सा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. महापौर मंगेश पवार यांनी या निधीसाठी तीन हप्त्यांत तरतूद करण्यास मान्यता दिली असून, यामुळे शहराच्या रखडलेल्या विकासकामांना नवी संजीवनी मिळणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या एम.डी. कविता यांनी सभागृहाला माहिती दिली की, संपूर्ण कर्नाटकातून केवळ बेळगावची या विशेष योजनेसाठी निवड झाली आहे. १३५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महापालिकेने संमती दर्शवणे अनिवार्य होते, ज्यावर आजच्या सभेत लोकप्रतिनिधींनी सविस्तर चर्चेनंतर शिक्कामोर्तब केले.
दक्षिणच्या आमदारांनी १३५ कोटींची योजना ७५ कोटींवर आणून राज्य सरकारने बेळगावच्या हक्काचा निधी डावलल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारने स्वतःचा वाटा न दिल्याने महानगरपालिकेवर हा आर्थिक भार पडत असल्याचे अभय पाटील यांनी नमूद केले.
सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाळी यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रस्तावाला झालेला विलंब हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणामुळे झाला असून त्याचे खापर लोकप्रतिनिधींवर फोडू नका, असा सज्जड दम त्यांनी दिला. बेळगावच्या प्रगतीसाठी महापालिका आपला वाटा देण्यास सदैव तत्पर असल्याची ग्वाही हनुमंत कोंगाळी यांनी दिली.





