बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील मोहीशेत ग्रामपंचायत हद्दीतील माचाळी गावात सोमवारी सकाळी अस्वलाच्या हल्ल्याची घटना घडली. या घटनेत गावातील बाबल खांडेकर जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास बाबल खांडेकर हे गाव परिसरात असताना अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी तत्काळ खांडेकर यांना लोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी खानापूर येथे हलविले असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन विभागाने परिसरात अस्वलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांनी तसेच जंगल परिसरात जाणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वन खात्याकडून करण्यात आले आहे.





