बेळगाव लाईव्ह : बेळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचे ७८ टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच प्रवासी क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे बेळगावच्या दळणवळण सुविधेत क्रांती होईल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी राज्यसभेत दिली.
खासदार ईरण्णा कडाडी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने सांगितले की, या प्रकल्पांतर्गत नवीन टर्मिनल इमारत आणि ‘कोड-सी’ विमानांच्या पार्किंगसाठी अॅप्रन वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या विकासकामामुळे विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता ८ लाखांवरून थेट ३५ लाखांवर पोहोचणार आहे. आतापर्यंत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर १८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
सध्या बेळगाव विमानतळ अहमदाबाद, बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली आणि जयपूर यांसारख्या प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. विमान कंपन्या व्यावसायिक व्यवहार्यता तपासून स्वतःहून नवीन मार्गांचा निर्णय घेतात, असेही सरकारने स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा आणि आखाती देशांसाठी थेट विमानसेवेबाबत सरकारने महत्त्वाची माहिती दिली. बेळगाव सध्या देशांतर्गत विमानतळ असून, भविष्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे ही प्रवाशांची मागणी, द्विपक्षीय करार आणि इमिग्रेशन-कस्टम्स सारख्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतील, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले.





