बेळगाव लाईव्ह :बेळगाव आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांना अपघात प्रकरणांशी संबंधित वकील किंवा पक्षकारांना आवश्यक कागदपत्रे पुरवण्याबाबत तात्काळ निर्देश द्यावेत, अशी मागणी वजा विनंती बेळगाव शहरातील वकील मंडळींनी शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
बळगावातील वकिलांच्या शिष्टमंडळाने ॲड. एन. आर. लातूर व ॲड. के. के. यादगुडे यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्तालयामध्ये आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. तसेच त्यांना सादर करत असलेल्या निवेदनाबद्दल माहिती दिली.
अलीकडेच केंद्र सरकारने 2019 च्या मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमध्ये केलेल्या सुधारणेनुसार अपघाताच्या दाव्याच्या याचिका अपघाताच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत न्यायालयासमोर दाखल करणे आवश्यक आहे. या सुधारित कार्यपद्धतीनुसार अपघातातील वाहनांची एफआयआर, तक्रार, वाहन सुटका बंधपत्र (व्हेईकल रिलीज बॉण्ड), आरसी, डीएल, विमा पॉलिसी इत्यादी कागदपत्रे दावा याचिका दाखल करण्यासाठी आवश्यक असतात.

तथापी वकील व पक्षकारांना योग्य वेळी ही कागदपत्रे मिळवण्यात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यासाठी आपल्याला विनंती आहे की, वाहने ताब्यात दिल्यानंतर अपघाताची कागदपत्रे, संबंधित पक्षांच्या वकिलांना सहाय्य म्हणून लवकरात लवकर पुरवण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना तात्काळ द्यावेत. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हित जपले जाईल आणि न्याय प्रस्थापित करण्याच्या हेतूने वकिलांचा आदर राखला जाईल, अशा आशयाचा तपशील पोलीस आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदनाचा स्वीकार करून आयुक्त बोरसे यांनी वकिलांना त्यांच्या विनंतीची तातडीने पूर्तता केली जाईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी ॲड. एन. आर. लातूर, ॲड. के. के. यादगुडे, ॲड. अण्णासाहेब घोरपडे, ॲड. शरद देसाई यांच्यासह अन्य वकील मंडळी उपस्थित होती.





