बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील वैभवनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. प्रशासनाच्या विस्कळीत नियोजनामुळे स्थानिक रहिवाशांना दैनंदिन गरजांसाठी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
वैभवनगरमध्ये पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने आणि अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. काही भागात तर पाणीच पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या सर्व गोंधळाला संबंधित वॉटरमॅनचा मनमानी कारभार जबाबदार असल्याचा थेट आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
अनेकदा तक्रारी करूनही महापालिका आणि संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पदरमोड करून टँकर मागवावे लागत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वैभवनगरमधील संतप्त रहिवाशांनी दिला आहे.



