बेळगाव लाईव्ह :बागलकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या उर्वरित मुस्लिम उपद्रवींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी श्रीराम सेना बेळगावने राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे.
श्रीराम सेना उत्तर कर्नाटक प्रदेश अध्यक्ष रविकुमार कोकितकर व राज्य उपाध्यक्ष विनया अंगरोळी यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्र्यांच्या नावे असलेले उपरोक्त मागणीचे निवेदन आज सकाळी बेळगाव तहसीलदारांना सादर करण्यात आले. तहसीलदारांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित गृहमंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठवले जाईल असे आश्वासन दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बागलकोट मध्ये शांततेने साजरी केली जात असताना जयंती मिरवणुकीवर मुस्लिम धर्मांधांनी दगडफेक केली. हा शिवरायांचा अपमान आहे. दगडफेक करणाऱ्या कांही मुस्लिम धर्मांधांना आधीच अटक करण्यात आली असली तरी उर्वरित आणखी अनेकांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

दगडफेकीचे हे कृत्य घडवून आणण्यामागे कोणाचा हात आहे? याची चौकशी करून संबंधितांना अटक करावी. राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुंडांवर गुंडा कायदा लागू करावा आणि त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करावे अशी आमची मागणी आहे,
अशा आशयाचा तपशील गृहमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी रविकुमार कोकितकर व विनया अंगरोळी यांच्यासह श्रीराम सेना बेळगावचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते




