बेळगाव लाईव्ह :शिवसेनेतर्फे सीमाप्रश्नी 1969 मध्ये मुंबई येथील आंदोलनात बलिदान दिलेल्या शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज रविवारी सकाळी बेळगाव शहरातील सम्राट अशोक चौक रामलिंग खिंड गल्ली येथे गांभीर्याने पार पडला.
शिवसेना बेळगाव सीमाभाग, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समिती आणि खानापूर म. ए. समितीच्यावतीने आज रविवारी 8 फेब्रुवारी रोजी गेल्या 1969 च्या आंदोलनातील शिवसेना हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश शिरोळकर, शिवसेना सीमाभागचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संजय चतुर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आदी प्रमुख मंडळीसह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, युवा सेनेचे विनायक हुलजी, नारायण पाटील, विठ्ठल हुंदरे, संजय चतुर प्रकाश हेब्बाजी, बाळू भोसले, बाळकृष्ण चव्हाण, अनिकेत नरगुंदकर, ओमकार पाटील, सुनील चव्हाण विलास शिंदे आदी, त्याचप्रमाणे खानापूर म. ए. समिती, युवा समितीचे पदाधिकारी सदस्य आणि बहुसंख्य शिवसैनिक व समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सम्राट अशोक चौकातील शिवसेना हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच दोन मिनिटे मौन पाळून 1969 च्या आंदोलनातील शिवसेना हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सम्राट अशोक चौकातील शिवसेना हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच दोन मिनिटे मौन पाळून 1969 च्या आंदोलनातील शिवसेना हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी बोलताना माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी सांगितले की, 1968 साली शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बेळगावला आले होते. त्यावेळच्या जाहीर सभेत पुढील 26 जानेवारी 1969 च्या आत जर सीमाप्रश्नांची सोडवणूक झाली नाही तर केंद्रीय मंत्र्यांना आम्ही मुंबईमध्ये फिरणे कठीण करून सोडू असा इशारा दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सीमाप्रश्नी कोणताही निर्णय न घेण्यात आल्यामुळे शिवसेनेतर्फे मुंबईत आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळी सर्वप्रथम तत्कालीन मंत्री यशवंतराव चव्हाण यांना या आंदोलनाचा तडाखा बसला. तथापी सर्व रस्ते माहीत असल्यामुळे ते निसटून गेले.
मात्र त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते मनोहर जोशी वगैरे दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली 8 फेब्रुवारी 1969 रोजी मुंबईत आलेले भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना शिवसैनिकांनी घेरले. त्यावेळी पोलिसांनी प्रतिकार केला आणि परिस्थिती चिघळून त्या आंदोलनात 67 शिवसैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले अशी माहिती देऊन सीमा भागातील समस्त मराठी भाषिकांच्यावतीने माजी महापौर अष्टेकर यांनी शहीद शिवसैनिकांना श्रद्धांजली वाहिली.
समितीचे नेते माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी आपल्या भाषणात सीमाप्रश्नासाठी 1969 साली शिवसेनेने कशा पद्धतीने आंदोलन उभारले आणि ते आंदोलन कशा निष्ठुर पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न केला गेला. परिणामी शिवसेनेला आपले 67 शिवसैनिक कसे गमवावे लागले याबद्दल माहिती दिली. तसेच शिवसेनेच्या त्या आंदोलनाला तोड नाही आजपर्यंत सीमा प्रश्नासाठी तसे आंदोलन कधीही झालेले नाही असे स्पष्ट करून बेळगाव सीमाभागात मराठी भाषिकांवर अन्याय होत असेल तर कोल्हापुरातील शिवसेना आमच्या पाठीशी कायम ठामपणे उभी राहत असते.
अनेक पक्ष, नेते “सीमाप्रश्नी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” असे आश्वासन देत असतात, मात्र त्या पलीकडे ते कांहीही करत नाहीत. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो कायम सीमावासियांसोबत राहिला आहे, असेही माजी नगरसेवक जाधव यांनी सांगितले. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांनी समायोचित विचार व्यक्त करून शिवसेनेच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.




