बेळगाव लाईव्ह : आज-काल बैल, घोडे, गाढव यांची किंमत वाढली असून माणसाची किंमत मात्र कमी झाली आहे, तो स्वस्त झाला आहे. माणसाचे क्षुद्रीकरण, लिलीपितीकरण, माणसाचे खच्चीकरण, माणूस म्हणून त्याला न लेखन, अशा या काळात आपण जगत आहोत, असे विचार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ते निवृत्त परीक्षा नियंत्रक समीक्षक व लेखक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी व्यक्त केले.
प्रगतशील लेखक संघ, बेळगावच्यावतीने रेल्वे ओव्हर ब्रिज खानापूर रोड येथील कविवर्य पद्मश्री कॉ. नारायण सुर्वे साहित्य नगरी, श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल प्रांगण) येथे आयोजित 5 वे मराठी साहित्य संमेलन आज रविवारी साहित्यप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडले. याप्रसंगी डॉ. हिर्डेकर संमेलनाध्यक्ष या नात्याने बोलत होते. सदर समारंभाच्या उद्घाटन समारंभास प्रगतशील लेखक संघाचे राष्ट्रीय महासचिव चंदीगडचे डॉ. सुखदेवसिंग सिरसा यांच्यासह व्यासपीठावर प्रगतशील लेखक संघ बेळगावचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे, कार्यवाहक कृष्णा शहापुरकर, सल्लागार सुभाष ओऊळकर, ॲड. नागेश सातेरी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुखदेवसिंग सिरसा यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण झाले. चार सत्रात पार पडलेल्या या मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात अन्नपूर्णा महिला मंडळाचा स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न कॉ. अरुणा असफ अली पुरस्कार मुंबईचे सफाई कामगार नेते कॉ. दीपक भालेराव यांना प्रदान करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार मुंबईचे मधुकर भावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख तिसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या मराठी विभागाचे डाॅ. नंदकुमार मोरे यांचे ‘नारायण सुर्वे यांचे काव्य विश्व’ या विषयावर व्याख्यान झाले.
संमेलनाच्या अखेरच्या सत्रात सायंकाळी प्रगतशील लेखक संघाच्या सदस्य कवींकडून नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभिवाचन झाले अनिल आजगावकर यांची संकल्पना व संहिता लेखन असलेल्या या कार्यक्रमात प्रा. अशोक अलगोंडी, मधु पाटील, रोशनी हुंदरे व नीला आपटे या कवींचा सहभाग होता.
साहित्यप्रेमींच्या उत्तम प्रतिसादात पार पडलेले हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रगतशील लेखक संघ बेळगावचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे, कार्यवाहक कृष्णा शहापुरकर, उपाध्यक्ष अनिल आजगांवकर, मधु पाटील, सहकार्यवाह अशोक अलगोंडी, खजिनदार किर्ती कुमार दोसी, प्रा. दत्ता नाडगौडा, रोशनी हुंदरे, शिवलीला मिसाळे, सागर मारगाण्णाचे, लता पावशे, अर्जुन सांगावकर आदींनी विशेष परिश्रम घेतले




