बेळगाव लाईव्ह “आपली परंपरा आणि नैतिक मूल्ये जपण्यासाठी समाजाने जागरूक राहणे आवश्यक आहे. संघटित राहिल्यास समाज अधिक बलशाली होईल असे मत शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी व्यक्त केले .
हिंदू समाज संघटित व्हावा आणि संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने बेळगाव उपनगरातील हिंदू संमेलन समितीच्या वतीने मंगळवारी ‘विराट हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. खडेबाजार येथील संयुक्त महाराष्ट्र चौकात झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला संमेलनाचे मुख्य वक्ते म्हणून शेटे यानी मार्गदर्शन करताना मांडले आहेत.
दुपारी कित्तूर राणी चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरापासून संमेलनाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. पारंपारिक वेशभूषा केलेले भाविक आणि ढोल-ताशांच्या गजरामुळे शहरात उत्साहाचे वातावरण होते. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून जात खडेबाजार येथे विसर्जित झाली.

जगद्गुरु वेदांत आचार्य श्री गोसावी महासंस्थान मठ, बेंगलूर येथील मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी समाजाने धर्म व संस्कृतीपासून दूर न जाता सजग आणि संघटित राहण्याचे आवाहन केले. सनातन धर्म हा अहिंसा, करुणा, परस्पर सन्मान व कर्तव्यभाव यावर आधारित असून इतरांच्या दुःखात सहभागी होणे हीच खरी संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शातून प्रेरणा घ्यावी तसेच तरुणांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनुसार चारित्र्य, ज्ञान आणि सेवाभाव जोपासावा, असे त्यांनी नमूद केले. पालकांनी मुलांमध्ये लहानपणापासून संस्कार रुजवावेत आणि भगवद्गीतेसारख्या ग्रंथांतून जीवनमूल्यांची ओळख करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोज अध्यक्ष दिगंबर पवार आणि सचिव जोतिबा पालभ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. व्यासपीठावर गजानन मिसाळे, अनिल अष्टेकर, प्रकाश हलगेकर यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. संमेलनानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.



