बेळगाव लाईव्ह : मंडोळी रोडवरील लोटस काउंटीच्या मागील बाजूस असलेल्या शेतवडीत शुक्रवारी सायंकाळी आग लागून शेतकऱ्यांच्या शेतीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अज्ञात नागरिकांनी जाणीवपूर्वक आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आग वेगाने पसरत असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी रणजीत बाळेकुंद्री आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रयत्न केले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
सध्या परिसरात अशा प्रकारच्या आगीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काही भागात वीजपुरवठा खंडित न झाल्याने आग अधिक भडकण्याचा धोका निर्माण होत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, संबंधित प्रकरणी चौकशी करून दोषींना धडा शिकवण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.



