बेळगाव लाईव्ह : राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी ‘अक्का पथक’ या विशेष मोहिमेचा बेळगावमधील राणी चन्नम्मा चौक येथून अधिकृत शुभारंभ करण्यात आला. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते या उपक्रमाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
हे विशेष पथक राज्यातील ३१ जिल्हे आणि ५ पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि गृह विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा हा उपक्रम प्रामुख्याने शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी गस्त घालणार आहे. याप्रसंगी पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महिलांच्या निर्भय वावराचे महत्त्व अधोरेखित केले. जेव्हा महिला रात्री उशिरापर्यंत सुरक्षितपणे फिरू शकतील, तेव्हाच देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणता येईल, असे मत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.

महिलांवरील अत्याचार आणि बालविवाहासारख्या घटना रोखण्यासाठी १८१ आणि १०९८ हे हेल्पलाईन क्रमांक प्रभावीपणे काम करतील, असेही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
संकटकाळात महिलांनी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास अवघ्या दोन मिनिटांत अक्का पथक मदतीला धावून येईल, अशी ग्वाही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. महिला पोलीस कर्मचारी आणि एनसीसी कॅडेट्सचा समावेश असलेल्या या पथकाचा विस्तार आगामी काळात संपूर्ण राज्यभर करण्यात येणार असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.



