बेळगाव लाईव्ह :बेळगाव-गोवा मार्गावरील जांबोटी जवळील कुस्मळी नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू होणारा हा पूल जानेवारी उजाडला तरी अद्याप रेंगाळलेलाच आहे.
कुस्मळी येथील जुना ब्रिटीशकालीन पूल पाडल्यानंतर या ठिकाणी नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. पावसाळ्यात तात्पुरता रस्ता वाहून गेल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते, त्यानंतर पुलाचा स्लॅब घाईघाईने पूर्ण करून हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आला.
मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते आणि संरक्षक भिंतींचे काम अद्याप अपूर्ण आहे. हे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु सध्याची कामाची गती पाहता प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पुलाचे मुख्य काम पूर्ण झाले असले तरी जोड रस्त्यांचे काम धीम्या गतीने का सरकत आहे, याचे कारण स्पष्ट होत नाहीये. या दिरंगाईमुळे अवजड वाहतूक अद्यापही विस्कळीत असून प्रवाशांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जांबोटी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.





