बेळगाव लाईव्ह :भारत विकास परिषदेच्यावतीने वंदे मातरम् ला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त परिषदेच्या सदस्यांचा सामूहिक संपूर्ण वंदे मातरम् तसेच विविध देशभक्ती समूहगायनाचा कार्यक्रम 26 जानेवारी रोजी सायंकाळी वीर सौध, काँग्रेस विहीर गांधी उद्यानात अपूर्व उत्साहात झाला. परिषदेच्या सर्व सदस्यांनी सामूहिकरित्या एकस्वर-तालात वंदे मातरम् आणि विविध देशभक्ती समूहगीते सादर करुन भारतमातेला अनोखी मानवंदना दिली.
प्रारंभी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाले, 'वंदे मातरम' हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा बनलेले आणि देशभक्तीचे प्रतीक असलेले गीत आहे, जे त्यांच्या 'आनंदमठ' कादंबरीत आहे.
रवींद्रनाथ टागोर यांनी ते पहिल्यांदा गायले आणि १९५० मध्ये ते भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून घोषित झाले, जे मातृभूमीला वंदन करते. या गीताने लाखो भारतीयांमध्ये देशभक्तीची ज्योत पेटवली. ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या प्रत्येक आंदोलनात 'वंदे मातरम्' चा जयघोष प्रेरणादायी ठरला.
हे गीत स्वातंत्र्यसैनिकांसाठी मातृभूमीवरील प्रेम आणि प्रतिकाराचे प्रतीक बनले. या स्वातंत्र्यमंत्राला 150 वर्षे पूर्ण झाली. हे वर्ष साजरे करण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
त्यानंतर सदस्यांनी संपूर्ण वंदे मातरम्, जयोस्तुते श्री महन्मंगले, उधळीत शतकिरणा, ताई भारतीय पादपद्मगळ पूजिसोन, विश्वविनुतन विद्याचेतन सर्व हृदय संस्कारी, हम होंगे कामयाब आदि सुंदर गीते सामूहिकपणे अप्रतिमरित्या प्रस्तुत करुन उपस्थितांमध्ये राष्ट्रचैतन्य निर्माण केले. विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारीने अप्रतिम सामूहिक गायन केले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अक्षता मोरे यांनी केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास भारत विकास परिषदेचे सदस्य व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.