बेळगाव लाईव्ह : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट न्यास यांच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या पालखी व पादुकांच्या परिक्रमेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यंदा या पवित्र परिक्रमेचे २९ वे वर्ष असून, महाराष्ट्रभर परिभ्रमण करत ही परिक्रमा बेळगाव शहरात १९ ते २६ जानेवारीदरम्यान विविध ठिकाणी मुक्कामी राहणार आहे.
अनेक स्वामीभक्त, अबालवृद्ध, महिला यांना अक्कलकोट येथे प्रत्यक्ष जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणे शक्य होत नाही. अशा भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा व त्यांची सेवा स्वीकारावी, या उद्देशानेच श्री स्वामी समर्थ स्वतः भक्तांच्या गावी येतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट न्यास यांच्या वतीने पालखी व पादुकांच्या परिक्रमेचे अक्कलकोट येथून १६ नोव्हेंबर रोजी प्रस्थान झाले आहे. महाराष्ट्रातील विविध शहरे व गावांना भेट देत ही परिक्रमा २० जानेवारी रोजी बेळगावात दाखल होणार असून, २५ जानेवारीपर्यंत बेळगाव शहरातील विविध ठिकाणी मुक्कामी राहणार आहे.

तरी बेळगाव व परिसरातील सर्व स्वामीभक्तांनी श्री स्वामी समर्थांच्या पालखी व पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोटचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी केले आहे.





