बेळगाव लाईव्ह :महात्मा गांधी यांची हत्त्या झालेल्या दिवसाकडे हुतात्मा दिन म्हणून पाहणाऱ्या सौहार्द कर्नाटक वेदिके बेळगाव या संघटनेतर्फे आज शुक्रवारी सकाळी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलनाद्वारे सर्व जाती-धर्म भाषांमध्ये सौहार्दतेचे आवाहन करण्यात आले.
सौहार्द कर्नाटक वेदिके बेळगाव या संघटनेतर्फे एआयटीयुसी नेते ॲड. नागेश सातेरी, सीआयटीयु नेते जे. एम. जैनेखान, नागनूर रुद्राक्ष मठाचे मठाधीश श्री अल्लमप्रभू महास्वामी, मौलाना मुस्ताक अहमद अश्रफी, मॅथोडिस्ट चर्चचे गुरू नंदकुमार डी. एस., पर्यावरणवादी शिवाजी कागणीकर आदींच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या आंदोलनावरप्रसंगी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करण्यात आली.
त्याचप्रमाणे आंदोलनात सहभागी स्त्री-पुरुषांनी हिंदू -मुस्लिम भाई भाई यासारख्या घोषणा देऊन समाजात सौहार्दतेचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले. आजच्या या आंदोलनात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे सर्व जाती-धर्मांच्या धर्मगुरू आणि प्रमुख व्यक्तींचा सहभाग होता.

सदर आंदोलनासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना ॲड. नागेश सातेरी यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांची हत्या झालेला दिवस आम्ही हुतात्मा दिन म्हणून पाहतो आणि देशांमध्ये सौहार्दता राहावी सर्व जाती-धर्म भाषांमध्ये एक चांगले वातावरण रहावे या उद्देशाने आजचा हा मानवी साखळीचा कार्यक्रम करण्यात आला आहे.
महात्मा गांधी यांची हत्या फक्त नथुराम गोडसे या माणसाने केलेली नाही तर एका घाणेरड्या विचारसरणीने केलेले हे कृत्य आहे. ज्या घाणेरड्या विचारसरणीऐवजी या देशात फॅसिस्ट प्रवृत्तीचे राजकारण यावं आणि हा देश पुन्हा मनुस्मृतीच्या छायेखाली आला पाहिजे. आज या देशांमध्ये जे चालले आहे, त्या सर्व गोष्टींना विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचे पाद्री, मुसलमान समाजाचे मौलवी, श्री अल्लम प्रभू स्वामीसह विविध मठांचे स्वामी उपस्थित होते.
या सर्वांनी सौहार्दतेचा पुरस्कार केला असून आम्ही पुरोगामी विचारसरणीच्या सर्व लोकांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या देशातील सर्वधर्म जाती भाषांमध्ये सौहार्दता नांदावी अशी आमची इच्छा आहे. तसेच नथुराम गोडसे प्रवृत्ती विरुद्ध लढण्याचा ठाम निर्धार देखील आहे, असे ॲड. नागेश सातेरी यांनी स्पष्ट केले.




