बेळगाव लाईव्ह : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी, ११ जानेवारी २०२६ रोजी बेळगावमध्ये ५८ व्या राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, साने गुरुजी कथामालेच्या स्थापनेचे हे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष असून, या निमित्ताने होणाऱ्या या अधिवेशनाची माहिती स्वागताध्यक्ष तथा दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे राष्ट्रीय अधिवेशन टिळकवाडी येथील खानापूर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील ओरिएंटल इंग्लिश स्कूलच्या आवारात असलेल्या श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (दिवंगत लोकनेते प्रा. एन. डी. पाटीलनगर) येथे संपन्न होईल. अधिवेशनाची सुरुवात रविवारी सकाळी १०:१० वाजता अ. भा. साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष हसन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सरोज एन. पाटील (माई) यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक भाषा तज्ञ डॉ. गणेश देवी, जीएसटी बेळगावचे अप्पर आयुक्त आकाश शंकर चौगुले, विचारवंत डॉ. आनंद मेणसे, प्रा. शामराव पाटील, डॉ. सीमा परदेशी आणि विश्वस्त लालासाहेब पाटील यांची महत्त्वाची उपस्थिती राहणार आहे.
अधिवेशनाच्या मुख्य कार्यक्रमात उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी १२:३० वाजता ‘साने गुरुजी विचारधारा’ या विषयावर अभ्यासपूर्ण परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारच्या सत्रात विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडेल आणि त्यानंतर दुपारी ३:३० वाजता खुले अधिवेशन सुरू होईल. सायंकाळी ५ वाजेपर्यंत या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप आणि आभार प्रदर्शन होईल. या मुख्य कार्यक्रमापूर्वी शनिवार, १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून कार्यकारी मंडळाची सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विश्वस्त सभा अशा विविध संघटनात्मक बैठकांचे नियोजनही करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक अमृत महोत्सवी अधिवेशनाला शरदचंद्र पाठक, इंद्रजीत पाटील, ॲड. रवींद्र हलीगल्ली यांच्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला कॉ. कृष्णा शहापूरकर यांच्यासह दोन्ही संस्थांचे स्थानिक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बेळगावातील या साहित्य आणि विचारांच्या मेळाव्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.




