बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचा बेजबाबदारपणा आणि विरोधी पक्ष काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळे शहराचे प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे, असा घणाघाती आरोप सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपन्नावर यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या नावावर मते मिळवून सत्तेत आलेल्या भाजपने पालिकेला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवले आहे. मार्च २०२२ पासून पालिकेच्या उत्पन्नात घट होत असून, १.५८ लाख मालमत्तांपैकी केवळ ७० टक्के कर भरला जात आहे; मात्र उर्वरित वसुलीसाठी प्रशासन कोणतेही ठोस प्रयत्न करत नसल्याचे राजकुमार टोपन्नावर यांनी म्हटले.
व्यापारी गाळ्यांचा लिलाव रखडल्याने पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. कचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा असलेला १३८ कोटींचा ‘सिटी ईस २.०’ प्रकल्प पालिकेच्या हलगर्जीपणामुळे रद्द होण्याची भीती आहे. पालिकेने स्वतःचा ८१ कोटींचा हिस्सा न दिल्यास हा निधी परत जाईल, असा इशारा राजकुमार टोपन्नावर यांनी दिला आहे.
एकीकडे महापालिकेचे दिवाळे निघत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. विरोधी पक्ष काँग्रेस केवळ नावापुरता उरला असून, ई-प्रॉपर्टीच्या नावाखाली सत्ताधारी आणि विरोधक मिळून जनतेची लूट करत असल्याची टीका राजकुमार टोपन्नावर यांनी केली आहे.




