बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी एका भीषण विमान अपघातात निधन झाले. ही हृदयद्रावक घटना बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी घडली.
अजित पवार हे मुंबईहून एका नियोजित दौऱ्यासाठी बारामतीकडे रवाना झाले होते, मात्र विमान धावपट्टीवर उतरत असतानाच ही दुर्घटना घडल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाच्या जवळ पोहोचले असताना त्यात अचानक तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाने विमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, परंतु लँडिंगच्या वेळी विमानाचा समतोल बिघडला आणि ते धावपट्टीच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत वेगाने कोसळले.

जमिनीवर आदळताच विमानाने भीषण पेट घेतला. स्थानिक नागरिक आणि विमानतळ प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले, मात्र आगीची तीव्रता एवढी जास्त होती की विमानात असलेल्या कोणालाही वाचवता आले नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या रोखठोक स्वभावासाठी आणि प्रशासनावरील पकडीसाठी ओळखले जाणारे ‘दादा’ आता आपल्यात नाहीत, या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.




