बेळगाव लाईव्ह :दि. 6 जानेवारी रोजी नाशिकच्या एसपींकडून बेळगाव पोलिसांना अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. चोर्ला घाटात सुमारे 400 कोटी रुपयांची दरोडा/लूट झाल्याचा संशय या पत्रात व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती एसपी के. रामराजन यांनी दिली.
रविवारी बेळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, गेल्या 22 ऑक्टोबर रोजी संदीप पाटील नावाच्या व्यक्तीचे अपहरण झाले होते, तसेच 16 ऑक्टोबर रोजी सुमारे 400 कोटी रुपयांची रक्कम लुटण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच विशाल नायडू नावाच्या व्यक्तीचे नाशिकमध्ये अपहरण झाल्याचेही समोर आले आहे.
बेळगाव पोलिसांनी संदीप पाटील यांची चौकशी केली असता, त्यांचे अपहरण करणाऱ्यांनी आपल्या समोर पैशांच्या दरोड्याबाबत कबुली दिल्याचे संदीपने पोलिसांना सांगितले आहे.
घटना चोर्ला घाटात घडल्याने, कोणीही तक्रार दिल्यास बेळगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येईल. या घटनेचे साक्षीदार किंवा पीडित व्यक्तींनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसपींनी केले.

या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र पोलीस करत असून, कर्नाटक पोलीस संपूर्ण सहकार्य करणार आहेत. चोर्ला घाट हा तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.
लुटलेली रक्कम कोणत्या चलनी नोटांची आहे, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी चोर्ला घाटात नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिक पोलिसांचे विशेष तपास पथक या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बेळगावकडे रवाना झाले आहे. या पथकात नाशिकचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकारी सहभागी असून, चोर्ला घाटातील कथित 400 कोटींच्या लुटीप्रकरणी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पुरावे, साक्षीदार आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे. बेळगाव पोलिसांशी समन्वय साधत संयुक्त तपासाला वेग देण्याचे संकेत देण्यात आले आहेत.





