बेळगाव लाईव्ह :दांडेली परिसरातून खानापूर तालुक्यात प्रवेश केलेल्या हत्तींच्या कळपाने नागरगाळी, गोधोळी, गोधगेरी, सुळेगळी, हलगा, टिळ्ळीघाट, पाळी, डोंगरगाव, तिओली, गुंजी, सागरगाळी आणि अखेरीस सावरगाळी येथे मुक्काम ठोकला आहे. सावरगाळी हे खानापूरपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असल्याने गावात भीतीचं वातावरण आहे.
या परिसरात आधीच मृत्यू आणि विध्वंस पाहायला मिळाला आहे. महिनाभरापूर्वी सुळेगळी येथे उच्चदाब विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने दोन हत्ती ठार झाले होते. दरम्यान, कळपाने प्रवासादरम्यान हजारो एकरांवरील पिकांचे प्रचंड नुकसान केले असून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
सावरगाळीत कळपाचा ठिय्या — शेतकरी भयभीत
गेल्या शुक्रवारी (28 नोव्हेंबर) पासून हा कळप सावरगाळी परिसरात थांबला आहे. शनिवारी पाच हत्तींच्या या कळपाने नागप्पा गुरव व नारायण कपोलकर यांच्या शेतात घुसून संपूर्ण वर्षभर कष्टाने उभे केलेले भाताचे पीक अक्षरशः उध्वस्त केले. हत्तींच्या पायपीटीने पीकच नष्ट झाले नाही तर शेताभोवतीची तटबंदीही फोडून जंगलात फेकून दिली. त्यामुळे शेतकरी सतत भीतीत आहेत.
हत्ती खानापूरकडे वळणार की नंदगडमार्गे?
गेल्या वर्षी सावरगाळीत मोठा विध्वंस करणारे हत्ती पुढे आनंदगड ओलांडून नांदगड परिसरात थांबले होते. यंदा मात्र कळप खानापूरच्या दिशेने वळणार की त्यांनी पूर्वीचा मार्ग पकडणार, याबाबत ग्रामस्थ व वन विभागात प्रचंड संभ्रम आहे.
जागरूकता तर होते, पण अंमलबजावणी शून्य
सुळेगळीतील विजेच्या धक्क्यात दोन हत्ती मृत्युमुखी पडल्यापासून वन विभागाने ग्रामसभांद्वारे लोकांना हत्ती न हुसकावण्याचे, दगड मारू नये, फटाके न वाजवण्याचे आवाहन केले आहे. मात्र हत्ती सुरक्षितपणे जंगलात परत जावेत किंवा मानवी वस्तीपासून दूर जावेत यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
भरपाई वाढली, पण पैसे मात्र मिळत नाहीत
हत्तींपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई वाढवल्याचा वन विभागाचा दावा असला, तरी पंचनामे करूनही नुकसानभरपाई मिळण्यात प्रचंड विलंब होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. स्थानिकांचा वन विभागावर बेफिकीरीचा आरोप असून निवडून आलेले प्रतिनिधी, राजकीय पक्ष व सामाजिक संघटना याबाबत शांत असल्याने नाराजी वाढली आहे.
सावरगाळी परिसरात हत्ती सध्या तळ ठोकून असल्याने आणि शेतकऱ्यांची भीती शिगेला पोहोचल्याने तातडीच्या आणि प्रभावी हस्तक्षेपाची मागणी अधिक जोर धरू लागली आहे.


