बेळगाव लाईव्ह :ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रति टन ३५०० रुपये दराच्या मागणीसाठी छेडलेल्या आंदोलनाला आज शुक्रवार रोजी बेळगावमध्ये हिंसक वळण लागले. हत्तरगी टोलनाका येथे शेकडोंच्या संख्येने निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांसह दिसेल त्या वाहनांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे सध्या या परिसरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.
ऊस दराच्या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील हत्तरगी टोल नाका येथे सुरू असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाने आज तीव्र स्वरूप धारण केले. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळी हत्तरगी टोल नाका येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून जोरदार निदर्शने करण्यास सुरुवात केली.
महामार्ग रोखला जाण्याबरोबरच निदर्शनांची तीव्रता वाढू लागल्याने, तसेच पोलिसांनी वारंवार विनंती करूनही शेतकरी मागे हटण्यास तयार न झाल्यामुळे, अखेर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला.
पोलिसांनी लाठीचार्ज सुरू करताच संयम सुटलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी तात्काळ पोलिसांवर आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावरील दिसेल त्या खासगी व सार्वजनिक वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले, तसेच बऱ्याच वाहनांच्या खिडक्या फुटल्या.
या हिंसक घटनेमुळे बेळगाव-कोल्हापूर मार्गावरील बस वाहतुकीला मोठा फटका बसला. टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असले तरी, सध्या हत्तरगी टोल नाका परिसरात अत्यंत तणावग्रस्त वातावरण आहे.





