बेळगाव लाईव्ह :”भगवान श्रीकृष्णांनी आपल्या जीवनात अनेक लीला केल्या त्यामध्ये गोवर्धन लीला ही एक महत्त्वपूर्ण लीला आहे.”असे विचार इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी बोलताना व्यक्त केले.
इस्कॉन च्या वतीने कार्तिक मासानिमित्ताने नित्य दीपदान, दीपोत्सव इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये गेल्या बुधवारी इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात गोवर्धन पूजा व गो-पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
प.पू. भक्तीरसामृत स्वामी महाराजांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर झालेल्या प्रवचनात महाराजांनी गोवर्धन लीलेचे सुंदर वर्णन करून तिचा आध्यात्मिक हेतू स्पष्ट केला.
महाराज म्हणाले की, ब्रजधामात श्रीकृष्ण स्वतः उपस्थित असूनही तेथील ब्रजवासी दरवर्षी इंद्रदेवाची पूजा करत असत. इंद्र आपल्या पदाचा आणि शक्तीचा गर्व बाळगू लागला होता. हे पाहून भगवान श्रीकृष्णांनी विचार केला की इंद्राला नम्रतेचा धडा द्यावा आणि त्याचबरोबर लोकांना शिकवावे की अधिकार व सामर्थ्याचा उपयोग नेहमी परमेश्वराच्या आणि इतरांच्या सेवेसाठीच करावा.
त्या हेतूने श्रीकृष्णांनी सर्व ब्रजवासीयांना इंद्रपूजेऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास सांगितले. कारण गोवर्धन पर्वत आणि गोमाता हेच खऱ्या अर्थाने सर्वांचे पोषण, रक्षण आणि कल्याण करतात. ब्रजवासीयांनी भगवानाच्या आज्ञेप्रमाणे गोवर्धनाची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली.
ही घटना पाहून इंद्र रागावला. त्याने आपले सावर्तक ढग बोलावून ब्रजभूमीवर प्रचंड पाऊस पाडण्याचा आदेश दिला. पाऊस मुसळधार कोसळू लागला, रस्ते पाण्याने भरून वाहू लागले आणि सर्व ब्रजवासी भयभीत झाले.
आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला. त्या पर्वताखाली सर्व ब्रजवासी, मुले, स्त्रिया, गोमाता आणि जनावरे आश्रयास आली. सात दिवस सात रात्री अखंड पाऊस चालू राहिला, तरीही कोणालाही त्रास झाला नाही.
हे पाहून अखेर इंद्राचा गर्व भंगला. त्याने भगवान श्रीकृष्णापुढे शरणागती पत्करली. या लीलेद्वारे श्रीकृष्णांनी संपूर्ण जगाला हे शिकवले की अहंकाराचा नाश करून, अधिकाराचा उपयोग इतरांच्या सेवेसाठी करणे हेच देवत्वाचे लक्षण आहे.
त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांनी श्री गिरिराज गोवर्धनाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली, कारण त्या पर्वताने त्यांच्या आणि सर्व ब्रजवासीयांच्या जीवनात निस्वार्थ सेवाभाव दाखवला होता.
अशा रीतीने भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन लीला संपन्न करून भक्ती, नम्रता आणि निसर्गसेवेचा संदेश दिला.
महाराजांच्या प्रवचनानंतर उपस्थित भक्तांनी मंदिरात उभारण्यात आलेल्या गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घातली. संपूर्ण वातावरणात “गोवर्धनधारी श्रीकृष्ण भगवान की जय!” या घोषणांनी भक्तिरस दुमदुमला.







प्रवचनानंतर, सर्व भक्तांनी श्री गिरीराज भगवंतांना अर्पण करण्यासाठी आणलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. आणि महाप्रसादाचे उपस्थित भाविकांना वितरण करण्यात आले.
दररोज सकाळी तसेच संध्याकाळी सात ते आठ या वेळेत होणाऱ्या दीपदानाच्या कार्यक्रमात अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
शनिवारी प्रभुपाद तिरोभाव दिन
इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभूपाद यांचा तिरोभाव दिन शनिवार दि. 25 ऑगस्ट रोजी असून त्या दिवशी पहाटे 4.30 पासून मंगल आरती, हरिनाम जप, गुरु पूजा, श्रीमद् भागवत कथाकथन, आणि पुष्पांजली होईल. तर सायंकाळी 6.30 वाजल्या नंतर आरती प.पू. भक्ती रसामृत स्वामी महाराजांचे प्रवचन, दामोदर अष्टकम आणि सर्वांसाठी महाप्रसाद होईल. भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे.




