बेळगाव लाईव्ह : कंग्राळी बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रेची पूर्वतयारी मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. २८ एप्रिल २०२६ रोजी पारंपरिक वैभवात होणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने १६ सप्टेंबर २०२५ रोजी पहिला कटबंध वार पाळून या धार्मिक परंपरेचा प्रारंभ झाला.
या पहिल्या वारानिमित्त देवीची पूजाअर्चा आणि गदगेवरील पावलांचे पूजन करून धार्मिक विधी पार पडले. या दिवशी ठरलेल्या परंपरेनुसार गावातील सर्व व्यवहार, शेतकाम, दुकाने, गिरण्या आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
तसेच, गावकऱ्यांनी घरात भाकरी न करण्याचा संकल्प पाळला. विशेष म्हणजे, या दिवशी गावातील कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाण्यास किंवा बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करण्यास परंपरेनुसार मनाई करण्यात आली.
एकूण पाच वार पाळण्यात येणार असून, त्यातील पहिला वार पार पडला आहे. उर्वरित वार १९ सप्टेंबर, २३ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी साजरे होणार आहेत.

यावेळी महालक्ष्मी यात्रा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




