बेळगाव लाईव्ह : श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी मद्दुरू येथील गणपती विटंबनेच्या घटनेवरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. बेळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्नाटक सरकारला त्यांच्या तुष्टीकरणाच्या धोरणांवरून कठोर शब्दांत सुनावले. आता हिंदू समाज गप्प बसणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
मुतालिक म्हणाले की, मद्दुरू येथील गणपतीची मूर्ती विटंबनेची घटना ही फक्त एका मूर्तीचा नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान आहे. “जोपर्यंत अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण थांबत नाही आणि त्यांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. मदरशांमध्ये नेमके कोणते शिक्षण दिले जाते, ज्यामुळे अशा घटना घडतात, असा सवालही त्यांनी विचारला.
श्री रामसेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी पाकिस्तानसोबतच्या संभाव्य क्रिकेट सामन्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारवर ‘देशद्रोहाचा’ आरोप करत, केवळ पैशासाठी पाकिस्तानसोबत खेळल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा प्रमोद मुतालिकांनी दिला. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातील लोकांच्या डोळ्यांतील अश्रू अजूनही वाळलेले नाहीत. अशा परिस्थितीत केंद्र सरकार फक्त आर्थिक फायद्यासाठी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा विचार करत आहे.
‘ज्या भाजपने हिंदूंच्या सुरक्षेच्या नावाखाली सत्ता मिळवली, ते जर पैशासाठी असे कृत्य करणार असतील, तर देशातील कोट्यवधी हिंदू त्यांना कधीही माफ करणार नाहीत,’ असे मुतालिक यांनी ठामपणे सांगितले. पाकिस्तानसोबतचे सर्व व्यवहार थांबवले असताना, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणे हे राष्ट्रविरोधी कृत्य असल्याचे ते म्हणाले.
यापुढे हिंदू समाज शांत बसणार नाही, असा इशारा देत मुतालिक म्हणाले, ‘आता घरात घुसून मारावे लागेल.’ तसेच, त्यांनी पोलीस विभागाला राजकीय नेत्यांच्या दबावाखाली न येता कायद्यानुसार काम करण्याचे आवाहन केले. न्यायालयानेही अशा प्रकरणांमध्ये कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेला श्री रामसेनेचे पदाधिकारी रवीकुमार कोकितकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


