belgaum

विधायकतेकडून पुन्हा उत्सवाच्या मूळ स्वरूपाला फाटाच!

0
45
 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष:  बेळगावात शांतता आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने महामंडळानाय केलेले प्रयत्न अपुरे पडले असून, गणेश विसर्जन मिरवणुकीतील गोंधळ विलंब पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या वर्षीच्या ३० तासांच्या तुलनेत यावर्षी तब्बल ३९ तास चाललेल्या मिरवणुकीमुळे गणेशोत्सवाच्या मूळ विधायक स्वरूपाला फाटा दिल्याचे दिसून आले.

शिस्त लावण्याचे प्रयत्न अपुरे
बेळगाव जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका आणि दोन्ही गणेशोत्सव महामंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले होते. नियमांनुसार, विसर्जन मिरवणूक वेळेवर सुरू होणे आणि मूर्तींचे विसर्जन सलग होणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. सुरुवातीला काही मूर्ती विसर्जनासाठी आल्या, परंतु नंतर मिरवणुकीचा मार्ग रिकामा झाला, ज्यामुळे हजारो गणेशभक्तांचा हिरमोड झाला. केवळ बेळगावच नव्हे, तर सीमावर्ती भागातून आणि गोव्याहून आलेले भाविकही यामुळे निराश झाले.

डीजेमुक्त मिरवणुकीला फाटा
प्रशासनाने डॉल्बी, डीजे आणि फटाकेमुक्त विसर्जन मिरवणुकीचे आवाहन केले होते. याला काही मंडळांनी चांगला प्रतिसाद देत पारंपरिक वाद्यांना (ढोल, ताशा, झांज आणि भजनी मंडळे) प्राधान्य दिले. मात्र, अनेक मंडळांनी नियमांना बगल देत डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढली. या ३९ तासांच्या गोंधळामुळे मिरवणूक मार्गावरील नागरिक, व्यावसायिक आणि रुग्णालयातील रुग्णांनाही त्रास सहन करावा लागला. मिरवणूक मार्गावर अनेक रुग्णालये असल्याने ध्वनी प्रदूषणाने अनेक तासांपर्यंत या रुग्णांना त्रास सहन करावा लागला.

 belgaum

मूर्तींच्या उंचीची स्पर्धा आणि प्रशासनाचे आव्हान
मिरवणुकीला उशीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे मंडळांमधील मूर्तींची उंची वाढवण्याची आणि आपलीच मूर्ती सर्वात शेवटी विसर्जित करण्याची स्पर्धा. यामुळेच यंदा ३६० हून अधिक मूर्तींचे विसर्जन करावे लागले, ज्यामुळे विसर्जन तलावांवर प्रचंड ताण आला. यापूर्वी उंच मूर्तींमुळे झालेल्या दुर्घटना लक्षात घेता प्रशासनाने उंचीबाबत नियम घालून दिले होते, परंतु मंडळांनी ते पाळले नाहीत. त्यामुळेच, तलावांची संख्या वाढवण्याची किंवा त्यांची खोली वाढवण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

उत्सवाचा उद्देश हरवला
गणेशोत्सव साजरा करण्यामागे लोकमान्य टिळकांनी निश्चित केलेला मूळ उद्देश हरवत चालला आहे, अशी खंत अनेक जाणकार व्यक्त करतात. टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. मात्र, आता हा उत्सव केवळ काही मंडळांच्या स्पर्धेचे साधन बनला आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांना फाटा देत केवळ मोठेपणाच्या हव्यासापोटी विधी, पंचांग आणि मुहूर्तांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यंदाच्या चंद्रग्रहणासारख्या धार्मिक संकेतांनाही डावलून विसर्जन सुरू ठेवले गेले. त्यामुळे, हा उत्सव केवळ दिखाव्यासाठी उरला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुढील वर्षी कठोर पावले उचलण्याची गरज
उत्सवाच्या या विकृत स्वरूपाला आळा घालण्यासाठी पुढील वर्षी प्रशासन आणि दोन्ही गणेशोत्सव महामंडळांनी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. मिरवणुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. केवळ चर्चेच्या बैठका घेऊन सूचना देण्यापेक्षा, आडमुठे धोरण स्वीकारणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारल्यास शिस्त लागू शकते. टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवाचा गौरव कायम राखणे हे आजच्या पिढीचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.