बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारने ‘एसमा’ कायदा लागू करूनही राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्यांसाठी ५ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
राज्यभरातील परिवहन कर्मचारी ५ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाणार आहेत. सरकारने ‘एसमा’ कायदा लागू करून आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न केला असला, तरीही कर्मचारी मागण्यांवर ठाम राहिले आहेत, अशी माहिती संयुक्त कृती समितीचे निमंत्रक नागेश सातेरी यांनी दिली.
बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तीन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यामध्ये २०२० साली जाहीर केलेल्या १५ टक्के वेतनवाढीची ३८ महिन्यांची थकबाकी तात्काळ द्यावी,

२०२३ च्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ३१ टक्के महागाई भत्ता विलीन करून २५टक्के इतकी वेतनवाढ द्यावी, आणि मागील आंदोलनादरम्यान कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करावी या मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला असला तरी ते केवळ परिवहन कर्मचारीच चालवतील, असे सातेरी यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला सी.एस. बिडनाळ, सुरेश यरड्डी, ईरन्ना मडीवाळ , राजू पन्यगोळ, डी.एन. कांबळे, प्रकाश सिदनाळ, उमेश आणि वाय.जी. बट्टसूर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


