belgaum

बेळगाव-बेंगळूर वंदे भारत: ‘पोकळ’ आश्वासने की धावणार?

0
35
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि बेंगळूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याचा प्रश्न आता केवळ एक आशा नसून, बेळगावकरांमध्ये वाढत्या निराशेचे कारण बनला आहे. वारंवार मिळत असलेल्या आश्वासनांमुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. खासदार इरन्ना कडाडी यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्यासह भेट घेऊन लवकरात लवकर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुन्हा एकदा यावर स्पष्टीकरण दिले असून “या गाडीला आधीच मंजुरी मिळाली आहे. आम्हाला केवळ डब्यांच्या उपलब्धतेची प्रतीक्षा आहे. डबे मिळताच ही सेवा सुरू करण्यात येईल.” असे सांगितल्याने गेल्या वर्षभरातील अनेक घोषणांच्या मालिकेत या आश्वसनानाने एक नवीन भर पडली आहे.

या वंदे भारतच्या विलंबाच्या इतिहासात अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी धारवाड आणि बेळगाव दरम्यान ८ डब्यांच्या वंदे भारतची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती, जी ताशी ११० किलोमीटर वेगाने धावून ८ तासांपेक्षा कमी वेळेत पोहोचली. २०२४ च्या सुरुवातीला बेंगळूर-धारवाड वंदे भारतचा विस्तार बेळगावपर्यंत करण्याचा प्रारंभिक विचार होता, परंतु राजकीय विरोधामुळे ही योजना स्थगित करण्यात आली. ६ मे २०२५ रोजी रेल्वेमंत्री वैष्णव यांनी मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून बेळगावहून सकाळी सुटून दुपारी बेंगळूरुहून परत येणाऱ्या नवीन गाडीला मंजुरी दिल्याचे कळवले होते. जुलै २०२५ मध्ये प्रसारमाध्यमांमध्ये काही वेळापत्रके प्रसारित झाली, परंतु ती २०२३ च्या चाचणीदरम्यान चर्चा केलेल्या वेळापत्रकासारखीच असल्याचे स्पष्ट झाले. अखेर, १९ जुलै २०२५ रोजी खासदार इरन्ना कडाडी यांनी पुन्हा रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी मंत्र्यांनी गाडीला मंजुरी असून, डब्यांच्या उपलब्धतेची प्रतीक्षा असल्याचे पुन्हा नमूद केले.

 belgaum

रेल्वे अधिकाऱ्यांनी अनौपचारिकरित्या गाडीचा मार्ग, रेक, देखभाल डेपो (बेळगावात) आणि प्रवाशांची मागणी या सर्व बाबींना दुजोरा दिला असला, तरी अद्याप निश्चित तारीख जाहीर न होणे हा एक मोठा विरोधाभास आहे. याउलट, वारंवार पत्रव्यवहार, खासदारांच्या अनेक वैयक्तिक भेटी आणि जुनी किंवा पुनर्वापर केलेली वेळापत्रके प्रसिद्ध करणाऱ्या विविध वृत्तसंस्थांचे अहवाल समोर येत आहेत. बेळगावचे स्वतःचे खासदारही अलीकडेपर्यंत यावर शांत होते. ही परिस्थिती अति-नोकरशाहीचा परिणाम आहे की राजकीय कुरघोडीचा, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

याच भेटीदरम्यान काही इतर महत्त्वपूर्ण अपडेट्सही समोर आले आहेत. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी बेळगाव-मिरज विशेष गाडी एका महिन्याच्या आत नियमित प्रवासी ट्रेनमध्ये रूपांतरित करण्याचे आश्वासन दिले. तसेच, घाटप्रभा रेल्वे स्थानकावरील संथ आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडून लवकरच जागेला भेट देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या सर्व घडामोडींनंतरही बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्सप्रेस प्रत्यक्षात कधी सुरू होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ पोकळ आश्वासनांवर समाधान मानायचे की लवकरच ही महत्त्वाकांक्षी सेवा सुरू होणार, हे पाहण्यासाठी बेळगावकरांचा संयम आता कसोटीला लागला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.