बेळगाव लाईव्ह : मराठी विद्यानिकेतन शाळा नेहमीच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सामाजिक जाणीव जागृत करण्याचे प्रयत्न करते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांना शेतीचा अनुभव देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देण्यासाठी मराठी विद्यानिकेतनच्या जागृती मंचाने भात लावणी उपक्रम आयोजित केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देत शेतीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला.
कृषी संस्कृतीची तोंड ओळख करून देण्यासाठी विद्यार्थ्याना थेट शेतात नेऊन भात रोप लावणी करायला लावली. आधुनिक संस्कृतीत शहरी विद्यार्थ्यांचे नाते मातीशी असलेली नाळ तुटत चालली आहे त्याला परत जोड देण्यासाठी विध्यार्थ्यांना थेट शेतात नेऊन कृषी जगताच्या व्यवहाराची ओळख करून देण्यात आली. संस्कृती रक्षण जर करायचे असेल तर आपली भाषा आपली माती आणि परंपरा यांच्याशी जोडून रहाणे गरजेचे असते त्यासाठी मराठी विद्या निकेतन या शाळेने शेतात नटी लावण्याचा अभिनव उपक्रम राबवला.
कलखांब येथील युवा शेतकरी राहुल मनोहर हुक्केरीकर यांच्या आधुनिक शेती प्रकल्पाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी शेडमधील कृत्रिम रोप लागवड आणि आधुनिक शेती व्यवसायाची माहिती घेतली. राहुल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जमीन मशागत, भात लावणीच्या प्रक्रिया शिकवल्या. मुलांनी चिखलात उतरून पेरणी गीतांचा आनंद घेत शेतीचा अनुभव घेतला.

शिक्षण संयोजिका निला आपटे यांनी हुक्केरीकर कुटुंबीयांची ओळख करून दिली, तर नाट्य दिग्दर्शक शिवराज चव्हाण यांनी राहुल यांच्याशी परिसंवाद घडवून आणला. विद्यार्थ्यांनी कुतूहलाने प्रश्न विचारले. शाळेतील कृषी शिक्षक अरुण बाळेकुंद्री यांनी भात लावणी आणि सेंद्रिय शेतीबाबत माहिती दिली. दुपारच्या भोजनानंतर मुलांनी हुक्केरीकर कुटुंबीयांचे आभार मानले.हा उपक्रम शेतीविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीला सलाम करणारा ठरला.
सृजनशीलता हा जमीनिच स्थायी भाव आणि सर्जनशीलता हा शेतकऱ्याचा मूळ गाभा या दोन्ही गोष्टीच्या संगमातून निर्माण होते ती कृषी संस्कृती. भारत देश कृषी प्रधान देश आणि भारताचा अजूनही प्रमुख व्यवसाय हा शेती आहे सकस आणि दर्जेदार अन्न निर्माण करण्यासाठी नव्या उद्युक्त करण्याबरोबर मार्गदर्शन करणे गरजेचे आहे यासाठी या शाळेचा उपक्रम महत्वपूर्ण ठरतो.


