बेळगाव लाईव्ह :मुसळधार पावसामुळे कुद्रेमानी (ता. जि. बेळगाव) येथील जीवननगर परिसरातील एका घराची भिंत कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गेल्या मंगळवारी मध्यरात्री घडली. दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भिंत कोसळलेले घर श्रीमती सखूबाई गोपाळ पन्हाळकर यांच्या मालकीचे असून कौलारू घराची पश्चिमेकडील तडे पडून जुनाट झालेली संपूर्ण भिंत रात्री 12:30 वाजता अचानक कोसळली. त्यावेळी सखूबाई यांचा मुलगा एकटाच घरात झोपलेला होता, तर सखूबाई भिंत कोसळण्याच्या भीतीने शेजारी राहणाऱ्या नातलगांकडे झोपण्यासाठी गेल्या असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
तथापी घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, अन्नधान्य (भात, नाचणी इत्यादी) पूर्णतः नष्ट झाले असून सारा संसार उघड्यावर पडल्याने पन्हाळकर कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सखूबाई पन्हाळकर या विधवा असून त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. ग्रामपंचायत विकासाधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली असून लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आमदार व खासदार यांनी लक्ष घालून प्रशासनाकडून सखूबाई पन्हाळकर यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.


