बेळगाव लाईव्ह : बेळगाव सह सीमा भाग महाराष्ट्राला जोडणारा मार्ग म्हणून परिचित असलेला बेळगाव शहरापासून ते वेंगुरला रोड खड्डेमय झाला असताना दुरुस्ती करण्याची गरज असताना चक्क महाराष्ट्र विधानसभेत या रस्त्याविषयीची लक्षवेधी मांडण्यात आली.
चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजी पाटील यांनी बुधवारी महाराष्ट्र विधानसभेत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात बेळगाव वेंगुर्ला मार्ग राष्ट्रीय महामार्ग करावा यासंबंधी आज विधानसभेत लक्षवेधी मांडली.
आमदार पाटील यांनी विधानसभेत बोलताना कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातुन जाणारा बेळगांव-वेंगुर्ला मार्गावर गेल्या काही वर्षभरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे दरवर्षी किमान ६० ते ७० निष्पाप लोकांचे नाहक बळी गेले आहेत.

हा मार्ग वर्दळीचा असल्याने यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. परंतु या राज्यमार्गाची रुंदी कमी असल्याने वाहतुकीची कोंडी होते व दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.
या बेळगांव-वेंगुर्ला राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्ग करावा, जेणेकरून या मार्गाचा विकास होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर याचा चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील या रस्त्यालगतच्या गावांना व्यावसायिक दृष्ट्या मोठा फायदा होईल.




