बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी लाल -पिवळा कन्नड ध्वज फडकवल्याच्या निषेधार्थ कोनेवाडी (ता. जि. बेळगाव) येथे भगवा ध्वज फडकावून ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा देऊन मराठी व कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणाच्या खटल्यातील वॉरंट जारी केलेल्या 5 जणांपैकी शिवसेना नेते विजय शामराव देवणे यांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. आता उर्वरित चौघेजण आज शुक्रवारी बेळगाव चौथे जेएमएफसी न्यायालयासमोर हजर झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना देखील जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाने आज जामीन मंजूर केलेल्यांमध्ये शिवसेनेचे संग्रामसिंग भाग्यश्वरराव कुपेकर -देसाई, सुनील अर्जुन शिंत्रे, अमृत रामा जत्ती आणि संतोष लक्ष्मण माळवेकर यांचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड संघटनांकडून बेकायदेशीररित्या लाल -पिवळा ध्वज फडकवण्यात आला. बेळगाव महापालिकेसमोर लाल -पिवळा ध्वज फडकवण्याच्या कृतीचा निषेध करण्यासाठी कोल्हापुर येथील शिवसेनेचे नेते विजय देवणे हे 21 जानेवारी 2021 रोजी आपल्या सहकाऱ्यांसह बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी गावात चोरट्या मार्गाने दाखल झाले. तेथे त्यांनी कन्नड ध्वजाच्या विरोधात भगवा ध्वज फडकावून जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या. तसेच आपल्या या कृतीचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यांची ही कृती म्हणजे कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी देवणे आणि उपरोक्त चौघांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
यासंदर्भात भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर बोलताना म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगणातील १८ गावे महाराष्ट्रात सामील करून घेण्यासंदर्भात विधानसभेत घोषणा केली. बेळगाव परिसर हा सीमाभाग म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहे. भाषिक प्रांतरचनेनुसार तेलंगणाच्या धर्तीवर बेळगाव सीमाभागाचा समावेशदेखील महाराष्ट्रात करण्यात यावा यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी आम्ही करत आहोत. कर्नाटक सरकारच्या अन्यायाची सीमा इतकी वाढली आहे कि, महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची अडवणूक करून नाहक वाहनचालकांना त्रास देण्यात येतो. येथील सीमावासीयांवर कन्नडसक्ती लादण्यात येते. या सर्व प्रकारासंदर्भात, सीमावासीयांवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करून सीमाभागातील वास्तव मांडावे, सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती आम्ही महाराष्ट्र सरकारकडे करत असल्याची प्रतिक्रिया संग्रामसिंह कुपेकर यांनी दिली.
याचप्रमाणे शिवसेना (उबाठा) नेते सुनील शिंत्रे यांनीही कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्तीच्या धोरणाचा निषेध केला. ते म्हणाले, गेली अनेक वर्षे या भागातील मराठी बांधव सीमाप्रश्नाच्या लढाईत भरडला जात आहे. सीमावासीयांना महाराष्ट्रवासियांचा पाठिंबा नेहमी आहे. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करत असून सीमावासियांना लोकशाहीने दिलेले अधिकार मिळणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
सदर खटल्याची सुनावणी बेळगाव चौथे जेएमएफसी न्यायालयात सुरू असून सुनावणीला सातत्याने गैरहजर राहत असल्याबद्दल न्यायालयाने विजय शामराव देवणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध वॉरंट जारी केले होते. यापैकी देवणे यांना गेल्या सोमवारी 7 जुलै रोजी जामीन मिळाला आहे. त्यानंतर आज शुक्रवारी उर्वरित चौघेजण न्यायालयासमोर हजर झाल्यामुळे न्यायालयाने या चौघांनाही जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार आणि ॲड. हेमराज बेंचन्नावर काम पाहत आहेत.




