बेळगाव लाईव्ह विशेष : महाराष्ट्रात मराठा समाजाने विवाह संदर्भात घालून दिलेल्या आचारसंहितेच्या पालनाची सुरुवात सीमा भागात झाली आहे. बेळगाव मधील मराठा समाजात विवाहात अनेक अनिष्ट प्रथा वाढल्या आहेत त्यावर सार्वत्रिक टीका होत असताना आणि महाराष्ट्रातल्या विवाह आचारसंहितेचे पालनाची गरज बेळगाव व्यक्त होत असताना अद्याप मराठा समाजातील संघटनांनी यासाठी पुढाकाराची गरज होत आहे अशातच कोणतीही जनजागृती नसताना स्वयंप्रेरणेने आचारसंहितेचे पालन लग्न समारंभात पाहायला मिळाले आहे.
चन्नेवाडी ता.खानापूर येथील निवृत्त शिक्षक विठ्ठल पाटील यांचे चिरंजीव विनय व खानापूर तालुक्यातीलच अल्लेहोळ या गावचे प्रगतशील शेतकरी पांडुरंग सटवाप्पा पाटील यांची कन्या मयुरी यांचा शुभ विवाह रविवार दि. 08 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजून 38 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर नंदगड येथील दक्षिण विभाग सोसायटीच्या हॉल मध्ये हा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला,
अलीकडच्या काही वर्षापासून मराठा समाजातील विवाह हे वेळेच्या मुहूर्तावर लागत नाहीत, डॉल्बीचा अतिरेक करून मुहूर्तापूर्वी व नंतर दारूच्या नशेत धूर्त तरुण वर्ग, हुंड्याची देवाण घेवाण,प्रिवेंडिंग शूटिंग व कर्ज काढून बडेजाव करत लग्न करण्याची प्रथा रूढ होत चाललेली आहे, यावरून समाजातील सुज्ञ लोकांतून नाराजीचा सूर दिसून येऊ लागला, यावर सुधारणा आणण्यासाठी व आपल्या पारंपरिक,सांस्कृतिक पद्दतीने लग्न व्हावे यासाठी प्रयत्नही करूनही या सर्व गोष्टींना फाटा देण्यात येत होता, यामुळे।समाजाची तसेच वधू वर पक्षाची बदनामी होत होती.
गेल्या काही दिवसांपूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव तसेच महाराष्ट्रातील मराठा समाजाने घालून दिलेल्या आचारसहितेतील बहुतांशी नियम पाळून हा विवाह नातेवाईक,मित्रमंडळी व समाजातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत केवळ पंधरा दिवसांच्या अवधीत हा सोहळा वर व वधू पक्षाने पार पाडला.

ना डॉल्बीचा दणदणाट,ना नाचण्याचा धांगडधिंगा,ना प्रिवेडिंग शूटिंग,बडेजाव खर्च या सर्व गोष्टींची आचारसंहिता पाळत हा विवाहसोहळा सामोपचाराने दोन्ही कुटुंबांनी अगदी आनंदात पार पडला या दोन्ही कुटुंबांचा व पंच म्हणून उपस्थित असलेल्या सर्वांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
खानापूर तालुक्यात झालेले अशा पद्धतीचे विवाह बेळगावात देखील व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त होत असून समाजातील विविध स्तरातून यावर जनजागृतीची गरज आहे. बेळगाव सह सीमा भागात जर मराठा समाजात आदर्श विवाह व्हायचे असतील तर मराठा समाजाच्या प्रमुखांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याची गरज आहे आणि त्या जनजागृतीला सर्व स्तरातून पाठिंबा देखील देण्याची गरज आहे.