कत्ती कुटुंबाला घेरण्यासाठी ‘ऑपरेशन जे.जे.’?

0
3
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात सध्या राजकीय शीतयुद्ध सुरू आहे. एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणात कत्ती आणि जारकीहोळी कुटुंबांचा दबदबा होता. मात्र, ज्येष्ठ नेते उमेश कत्ती यांच्या निधनानंतर कत्ती कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाला धक्का बसल्याचं चित्र आहे. रमेश कत्ती यांच्याविरोधात आता ‘ऑपरेशन जे.जे.’ नावाचा नवा डाव सुरू झाल्याने जिल्ह्यातील राजकारण तापले आहे.

बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात डीसीसी बँक नेहमीच महत्त्वाची मानली जाते. अनेक वर्षांपासून ही बँक कत्ती कुटुंबाच्या ताब्यात होती आणि रमेश कत्ती अनेक वर्षे तिचे अध्यक्ष होते. मात्र, उमेश कत्ती यांच्या निधनानंतर कत्ती कुटुंबाने डीसीसी बँकेवरील नियंत्रण गमावले. त्यानंतर, हुक्केरी मतदारसंघाची जीवनरेखा मानली जाणारी ‘हीरा शुगर्स’ ही कत्ती कुटुंबाच्या प्रमुख राजकीय आश्रयस्थानांपैकी एक होती, तीही त्यांच्या हातून निसटली. डीसीसी बँकेच्या ‘सर्जरी’नंतर हुक्केरी मतदारसंघातील ग्रामीण विद्युत सहकारी संस्थेच्या राजकारणातही कत्ती कुटुंबाला धक्का बसला. त्यांच्या समर्थित अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला आणि विद्युत सहकारी संस्थेवरील कत्ती कुटुंबाचं वर्चस्वही संपुष्टात आलं.

कत्ती कुटुंबाने या तीन प्रमुख संस्थांमधील सत्ता गमावण्यामागे राजकीय सूड हेच कारण असल्याचे बोलले जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत रमेश कत्ती आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू होता. लोकसभा निवडणुकीत रमेश कत्ती यांनी अण्णासाहेब जोल्ले यांच्या विरोधात काम केले होते. आता अण्णासाहेब जोल्ले यांनी रमेश कत्ती यांच्या विरोधात ‘ऑपरेशन जे.जे.’ सुरू करून कत्ती कुटुंबावर सूड उगवला आहे.

 belgaum

‘ऑपरेशन जे.जे.’ हे आता हुक्केरी आणि चिक्कोडी भागात चर्चेत आहे. या ‘ऑपरेशन जे.जे.’ मध्ये, एक ‘जे’ म्हणजे जोल्ले (अण्णासाहेब जोल्ले) आणि दुसरा ‘जे’ म्हणजे जारकीहोळी (भालचंद्र जारकीहोळी) असे समजले जात आहे. जोल्ले आणि जारकीहोळी यांनी एकत्र येऊन हे ‘ऑपरेशन’ सुरू केल्याची चिक्कोडी भागातील जनतेची चर्चा आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत अण्णासाहेब जोल्ले चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार होते, तर त्यांच्या विरोधात मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियंका जारकीहोळी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यावेळी प्रियंका जारकीहोळी यांनी भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत रमेश कत्ती यांनी आपल्या विरोधात काम केले हे लक्षात आल्यानंतर, अण्णासाहेब जोल्ले भालचंद्र जारकीहोळी यांच्या गटात सामील झाले. त्यांनी भालचंद्र जारकीहोळी यांच्याशी जवळीक वाढवली आणि कत्ती कुटुंबाच्या विरोधात ‘ऑपरेशन जे.जे.’ सुरू केले, अशी चर्चा आता हुक्केरी आणि चिक्कोडी भागात सुरू आहे.

स्थानिक नेत्यांमुळेच तीन प्रमुख संस्थांमधील सत्ता गमावलेल्या रमेश कत्ती भाजपमध्येच राहतील की भाजप सोडून काँग्रेसमध्ये सामील होऊन अण्णासाहेब जोल्ले यांना आव्हान देतील, याबाबत आता जोरदार चर्चा सुरू आहे. इतक्या राजकीय घडामोडी होऊनही रमेश कत्ती अजूनही शांत आहेत.

माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने रमेश कत्ती यांची पुढील भूमिका काय असेल, याबाबत अद्याप गूढ कायम आहे. या राजकीय घडामोडींमुळे बेळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रमेश कत्तींच्या पुढील निर्णयाचा जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल याची चर्चा जनतेसहित राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.