बेळगाव लाईव्ह : बेळगाव पुणे वंदे भारत सुरू झाली.. मात्र गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून प्रलंबित असलेली बेळगाव बंगळुरू वंदे भारत कधी सुरू होणार हा प्रश्न आता लाख मोलाचा बनला आहे.
हे स्पष्ट आहे की, वंदे भारत एक्सप्रेस सेवेच्या बाबतीत बेळगाव अजूनही रेल्वे प्लॅटफॉर्मवरच अडकले असून धीराने (आणि वाढत्या प्रमाणात व्यंग्यात्मकपणे) सदर सेवा आपल्या शहरापर्यंत वाढवण्याची वाट पाहत आहे. परंतु अनेक महिन्यांची प्रतीक्षा, वर्षभर खासदारांच्या भेटी, आश्वासने, हिरवे सिग्नल, पिवळे दिवे, ‘व्यवहार्यता अभ्यास’ आणि चहा-समोसा बैठकांच्या रतिबानंतर ही रेल्वे अजूनही धारवाडच्या पलीकडे येणे एक मृगजळ ठरले आहे.
एका कानडी वृत्तपत्रातील एका सविस्तर लेखानुसार, माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनीही कबूल केले की, “सध्या धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहता, वेळ समायोजित करणे कठीण आहे. म्हणून ते बेळगावहून सकाळी 5 वाजता वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न करीत असून जर ते अंतिम झाले तर, वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे दुपारी 12:30 वाजता बेंगलोरला पोहोचून दुपारी 1:30 वाजता तिथून निघेल आणि रात्री 9 वाजता बेळगावला परत येईल.”
आपण बेंगलोर -धारवाड सेवा बेळगावपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळेचे गणित जमत नसल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, “जर वंदे भारत रेल्वे दुपारी 1:15 वाजता धारवाडहून निघून संध्याकाळी 7:45 वाजता बेंगलोरला पोहोचली, तर ती बेळगावपर्यंत वाढवण्यासाठी आणखी 5 तास लागतील. ज्यामध्ये 4 तास फेरीसाठी आणि 1 तास देखभालीसाठी लागणारा वेळ यांचा समावेश असेल. बेंगलोरमध्ये परतीचा प्रवास मध्यरात्र ओलांडेल ज्यामुळे प्रवाशांना घरी पोहोचणे कठीण होईल.”
बेळगावचा प्रवास मार्गदर्शक
ठीक असला तरी वेळा अवघड आहेत. पण इथे मुद्दा आहे फक्त बेळगावच्या बाबतीत. दरम्यान, गाड्या कमी प्रवाशांसह, कमी वेळेत आणि कमी नाट्यमयतेने खूप लहान ठिकाणी वाढवल्या जातात. बेळगावच्या बाबतीत जेव्हा जेव्हा काही उपयुक्त गोष्टी घडायचे असतात तेंव्हा प्रत्येक वेळी त्याला आडकाठी आणणारा एक अदृश्य हात असतो असे दिसते.
तर येथे एक सूचना आहे जी खरोखर अर्थपूर्ण आहे : सध्यासाठी वंदे भारत विसरून जा – आम्हाला जन शताब्दी एक्सप्रेस द्या! खऱ्या आम आदमीसाठीची एक रेल्वे जी अधिक नागरिकांना परवडेल आणि त्याचा फायदा होईल. आलिशान एसी सीट नाहीत, चमकदार एलईडी लाईट्स नाहीत, फक्त वेळेवर सेवा. चांगला आराम आणि बस, ऑटो आणि तीन पुनर्जन्म न घेता बेंगलोरला पोहोचण्याची क्षमता. बेळगाव ऐशआराम मागत नाहीये, आम्ही कनेक्टिव्हिटी मागत आहोत. जर ‘वंदे भारत’ हाताळणे अवघड असेल तर ठीक आहे. पण किमान ती मार्गावरून धावेपर्यंत आपण ‘जनशताब्दी’ सुरुवात करायला हरकत नाही. तोपर्यंत आपण इथे प्लॅटफॉर्मवर पुष्पहार आणि उपहासाची एक बादली घेऊन प्रतीक्षा करूया.
(सदर वृत्त कानडी दैनिकाच्या अहवालावर आधारित)