बेळगाव लाईव्ह : दहावीच्या परीक्षा अखेर संपल्या असून, विद्यार्थ्यांनी सुस्कारा टाकत आनंद साजरा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून परीक्षा आणि अभ्यासाच्या तणावाखाली असलेल्या या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला.
बेळगावमधील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी जल्लोषात परीक्षेचा शेवट केला. एकमेकांना मिठ्या मारत, रंगांची उधळण करत आणि आठवणी जपत विद्यार्थ्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला.
आज दहावीच्या परीक्षा संपल्या आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण पसरले. एकदाचा तणाव संपल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. परीक्षेच्या अंतिम दिवसानंतर सर्व विद्यार्थी रिलॅक्स मूडमध्ये परतले आणि शालेय जीवनातील या महत्त्वाच्या टप्प्याच्या यशस्वी पारावर जल्लोष केला.
२१ मार्च रोजी सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेने गेल्या काही आठवड्यांपासून विद्यार्थ्यांच्या मेहनतीची कसोटी पाहिली होती. अखेरच्या हिंदी पेपरनंतर विद्यार्थ्यांनी आपला आनंद गगनात मावेनासा झाला होता.
विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केल्यानंतर एकमेकांना मिठ्या मारत, ओरडत, नाचत आनंदोत्सव साजरा केला. काही विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत फोटो काढून, चेहऱ्यावर रंग लावून आणि आठवणी जपण्यासाठी ऑटोग्राफ घेत आपला आनंद व्यक्त केला. ही मित्रमैत्रिणींची अखेरची भेट असू शकते, या जाणिवेने काही विद्यार्थी भावनिक देखील झाले. बेळगावमधील विविध परीक्षा केंद्रांवर हे दृश्य पाहायला मिळाले.
गेल्या १५ दिवसांपासून अभ्यास आणि परीक्षेच्या दडपणात असलेले विद्यार्थी अखेर मोकळा श्वास घेताना दिसले. परीक्षेच्या तणावातून मुक्त होत त्यांनी पुढील टप्प्यासाठी योजना आखायला सुरुवात केली आहे.