बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेतील आक्रमक झालेल्या विरोधी गटाने आज पालिकेच्या महसूल विभागातील गैरकारभाराच्या विरोधात आयुक्तांच्या कक्षासमोर धरणे सत्याग्रह करून संताप व्यक्त केला.
बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागातील अनेक गैरप्रकार गेल्या सहा महिन्यात उघडकीस आले आहेत. मात्र कारवाईबाबत ठोस असा निर्णय झालेला नाही. या खेरीज ई -आस्थीसाठीचे अर्ज वेळेत निकालात काढले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
यावरून नागरिक व कर्मचारी यांच्यात वाद होत आहेत. नगरसेवकांकडेही तक्रार दाखल आहेत. त्याची दखल घेत विरोधी गटाने आज गटनेते नगरसेवक मुजम्मील डोणी यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त शुभा बी. यांच्या कक्षासमोर ठिय्या मारून धरणे आंदोलन सुरू केले. .
खुद्द नगरसेवक डोणी यांनी अशोक नगर येथील बेळगाव वन येथे अलीकडेच नियुक्त करण्यात आलेल्या दोघा महसूल निरीक्षकांविरुद्ध नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आहेत तेव्हा याची गंभीर दखल घेऊन तात्काळ चौकशी करण्यातद्वारे आवश्यक योग्य ती कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.
आंदोलन स्थळी बेळगावला लाईव्हशी बोलताना नगरसेवक रवी साळुंके यांनी सांगितले की, लोकांच्या तक्रारी असलेल्या संबंधित महसूल निरीक्षकांची अन्य विभागात बदली करावी अशी मागणी होती मात्र तसे होताना दिसत नाही ते निरीक्षक राजकीय दबाव वापरून पुन्हा आपल्या जागेवर रुजू होत आहेत हा प्रकार माझ्या देखील निदर्शनास आला आहे.
त्याचप्रमाणे सध्या ई -आस्थीचा जो प्रकार सुरू आहे त्यामुळे जनतेला त्रास होत आहे ई -आस्थीसाठी आवश्यक कागदपत्रांची लोकांकडून पूर्तता केली जात असताना देखील पैसे खाण्याची भ्रष्टाचाराची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांकडून या ना त्या कारणास्तव त्रास दिला जात आहे. मात्र तेच काम एजंटांमार्फत तात्काळ बिनबोभाट करून दिले जात आहे. या संदर्भात बऱ्याच तक्रारी आमच्याकडे आल्या असून महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत आम्ही या संदर्भात आवाज देखील उठवला होता. त्यावेळी आमचे विरोधी गटनेते मुजम्मील डोणी यांनी देखील हा विषय गांभीर्याने येण्याची गरज व्यक्त केली होती. सदर बाब आम्ही आज महापालिका आयुक्तांच्या त्याचप्रमाणे जिल्हा पालकमंत्र्यांच्या कानावर घालणार असून महसूल विभागातील कारभार कोणत्याही परिस्थितीत व्यवस्थित चांगला झाला पाहिजे. या विभागातील भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे, अशी मागणी करणार आहोत. महापालिकेच्या कायदा विभागातील एक अधिकारी आमचे सहकारी नगरसेवक फतेखान यांचे करासंबंधीचे काम करून देण्यास गेल्या महिन्याभरापासून टाळाटाळ करत असल्यामुळे परवा फतेखान यांच्यावर स्वतःच कायदा विभागात जाऊन जाब विचारण्याची वेळ आली.
या पद्धतीने जर एखाद्या कामाची पूर्तता होण्यासाठी नगरसेवकांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असेल तर जनतेला हे अधिकारी किती दिवस प्रतीक्षेत ठेवत असतील? असा प्रश्न करून मुख्य महसूल अधिकारी रेश्मा तालिकोटी यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचे गैरप्रकार सुरू असल्यामुळे त्यांनी याबाबत कठोर पावले उचलून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांना बेळगावतूनच हद्दपार करावे अशी आमची मागणी आहे, असे नगरसेवक रवी साळुंके शेवटी म्हणाले.