बेळगाव लाईव्ह :जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे 26 निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा श्रीराम सेना हिंदुस्थान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि श्रीराम सेना या हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र निषेध केला असून या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि श्रीराम सेनेचे स्थानिक प्रमुख रवी कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या नावे असलेले उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) देखील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले गेले.
या निवेदनांद्वारे जम्मू काश्मीर मधील दहशतवाद्यांच्या कालच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. तसेच हल्ल्यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व असुरक्षित प्रदेशातील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यापूर्वी बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक जाती-धर्माची चौकशी करून 26 हिंदूंची गोळ्या झाडून हत्या केली. कुटुंबातील लोक स्त्रियांसमोर त्यांच्या पुरुष मंडळींची करण्यात आलेली ही हत्या म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरून आम्ही एक दिवस महासत्ता बनू, ताकदवान राष्ट्र बनू असा विश्वास व्यक्त करत आहेत. माझी संबंधित राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे की हा भ्याड हल्ला करणारा शत्रू हा शेवटपर्यंत शत्रूच राहणार आहेत. तेंव्हा या दहशतवाद्यांना वेळीच ठेचून काढा. कारण आज कितीतरी निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. कितीतरी कुटुंब उध्वस्त झाली आहेत. कशाशीही संबंध नसताना केवळ जात-धर्म विचारून त्यांना ठार करण्यात आले आहे. जम्मू काश्मीर मधील घटनेचा फक्त भारतानेच नाही तर जगाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. तसेच या जगात जितके देश भारताच्या हिंदू राष्ट्राच्या विरोधात आहेत, त्यांच्या बाबतीत आपण कधीही मैत्रीचा हात पुढे करू नये, अशी माझी पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती आहे. कारण ते आपले शत्रू आहेत आणि शेवटपर्यंत शत्रूच राहणार आहेत असे सांगून कालच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या कुटुंबीयांना सरकारने नुकसान भरपाईसह आवश्यक मदत करून त्यांना दुःखातून सावरलं पाहिजे, असे मत कोंडसकर यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना श्रीराम सेनेचे नेते रवी कोकितकर म्हणाले की, जम्मू काश्मीरच्या पहेलगाम येथे काल 26 हिंदूंची हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या सर्वांना ते हिंदू आहेत म्हणून मारण्यात आले आहे. भारतातील हिंदूंच्या मनात दहशत निर्माण करणे हा दहशतवाद्यांचा या हल्ल्या मागचा हेतू होता. भारताला हिंदू राष्ट्र होऊ द्यायचे नाही आणि त्यासाठी आम्ही काय करू शकतो ते दाखवण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे, जे अत्यंत निंदनीय असून त्यासाठीच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन पाठवत आहोत. कालच्या हल्ल्यात जाणीवपूर्वक धर्माची चौकशी करून हिंदू लोकांना ठार मारण्यात आले आहे.
या पद्धतीने भारतात आतंकवादी, जिहादी प्रवृत्ती निर्माण करण्याचा घाट रचला जात आहे. देशातील कांही स्थानिक लोकांची साथ असल्यामुळे हे घडत आहे. देशातील स्थानिक मुसलमानाने अशा दहशत वादाला साथ दिली नाही तर देशात घातपात होणार नाही. त्यासाठी खरोखर भारतीय मुसलमान असलेल्यांनी पुढचा विचार करावा. देशात बहुसंख्यांक असणारे आम्ही हिंदू जर रस्त्यावर उतरलो तर परिस्थिती अवघड होईल याचा विचार त्यांनी करावा आणि तशी वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करून भारत हा शांतताप्रिय देश आहे, त्याला शांत राहू द्या. संविधानानुसार आम्हाला चालू द्या, असे कोकितकर यांनी शेवटी सांगितले.