बेळगाव लाईव्ह : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माध्यमक्षेत्राने प्रशासन व्यवस्था सुधारण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी पूरक भूमिका बजावली पाहिजे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम आणि पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केले.
रविवारी बेळगाव शहरातील शिव बसवनगर येथील एस्.जी.बी.आय.टी कॉलेजच्या सभागृहात नुकतेच अस्तित्वात आलेल्या बेळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
भाषिक संवेदनशीलता असल्यामुळे जिल्ह्यातील बातम्या दिल्लीतही गाजतात. म्हणूनच काहीवेळा वैयक्तिक संघर्ष जात-धर्म, भाषिक विषमतेचे स्वरूप धारण करून जिल्ह्याला वाईट नाव देतात. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला अडथळा निर्माण होतो. म्हणून जात-धर्म, भाषेच्या संदर्भातील संवेदनशील बाबींची अहवाल तयारी करताना माध्यमप्रतिनिधींनी संपूर्ण परिस्थितीचा विचार करून वास्तविकता प्रसारित करावी, असे मंत्री जारकिहोळी यांनी सुचवले.
पत्रकारांना प्लॉट आणि आरोग्य विमा यासहित सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. पत्रकारांना प्लॉट मंजुरीसाठी जिल्हाधिकारी, नगरविकास आयुक्त यांच्याशी चर्चा करण्यात येईल, अशी आश्वासने मंत्री जारकिहोळी यांनी दिली.
बातम्यांच्या सत्यासत्यतेची तपासणी करून प्रसारित कराव्यात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सरकारला जागृत करण्याचे काम करावे. समाजसुधारणा आणि जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची दूत म्हणून माध्यम आणि कार्यरत राहावेत असे आवाहन देखील त्यांनी केले.
पत्रकारांनी संघटित होऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करू शकतात. जिल्ह्यात आधीच पत्रकार भवनासाठी जमीन मंजूर करण्यात आली आहे. आगामी काळात नवीन इमारत बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनुदान दिले जाईल, असे मंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले की “लोकशाहीत न्यायपालिका, विधानमंडळ, कार्यपालिका आणि माध्यमे यांच्यामुळे प्रजासत्ताक यशस्वी होते. समाजात जागृती आणि जनजागृती निर्माण करण्याचे काम माध्यमे करतात. समाजबदलात इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रण माध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. म्हणून त्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे.”
बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी सांगितले, की “लोकशाहीत माध्यमे चौथा स्तंभ म्हणून काम करतात. सत्यनिष्ठ आणि प्रामाणिक अहवालांद्वारे समाजाचे कल्याण साधले पाहिजे.” यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी म्हटले, “संघटनेमुळे जबाबदारी वाढते. पत्रकारांनी लोकशाहीचे रक्षक म्हणून पारदर्शक दृष्टिकोनातून बातम्या प्रसारित कराव्यात असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद , महापालिका आयुक्त शुभा बी यांच्यासह बैलहोंगल विधानसभा आमदार महांतेश कौजलगी, कित्तूर आमदार बाबासाहेब पाटील, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, माहिती अधिकारी गुरुनाथ कडबुर उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक माध्यम संघटनेचे प्रतिनिधी, प्रिंट मीडिया पत्रकार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.