बेळगाव लाईव्ह :दावणगिरी, बिदर, शिमोगा, धारवाडसह राज्यातील विविध ठिकाणी सीईटी परीक्षेच्या वेळी ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या गळ्यातून जानवे काढायास लावल्याच्या निषेधार्थ, तसेच याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी शहरातील ब्राह्मण समाजातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
बेळगाव शहरातील ब्राह्मण समाजातर्फे कृष्ण मठाचे श्रीनिवास होन्नीदिब्ब आचार्य, जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टचे अध्यक्ष राम भंडारे, ॲड. एस. एम. कुलकर्णी, आर. एस. मुतालिक आदींच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी कन्नड साहित्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चामध्ये विश्व हिंदू परिषद तसेच बेळगाव शहर परिसरातील विविध ब्राह्मण व हिंदू संघटनांसह ब्राह्मण समाजाचे शेकडो स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पोहोचताच उपस्थित ब्राह्मण बंधू-भगिनींनी जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडला. ठिकाणी दावणगिरी, शिमोगा, बिदर, धारवाडसह राज्यातील विविध ठिकाणी परीक्षेच्या वेळी ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या गळ्यातून जाणवे लावण्याच्या कृतीबद्दल यावेळी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांना जानवे काढावयास लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
ब्राह्मण समुदायाच्या मोर्चाच्या आगमनाची वर्दी मिळताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन स्वतःहून जातीने मोर्चाला सामोरे गेले. त्यावेळी श्रीनिवास होन्नीदिब्ब आचार्य, आमदार अभय पाटील, राम भंडारे, ॲड. एस. एम. कुलकर्णी आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी रोशन यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सदर निवेदनामध्ये ब्राह्मण विद्यार्थ्यांना जानवे काढावयास लावण्याचा घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. तसेच संबंधित ब्राह्मण विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या अभियांत्रिकी वगैरे शाखेत प्रवेश देऊन न्याय द्यावा. त्याचप्रमाणे जानवे काढावयास लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा येत्या काळात राज्यव्यापी उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना होन्नीदिब्ब आचार्य यांनी धर्म पायदळी तुडवून कायद्याची अंमलबजावणी करणे योग्य नाही. धर्म जिथे आहे तिथे जय आहे. त्यामुळे धर्माच्या रक्षणासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. धर्म संरक्षणासाठी ब्राह्मणांनी गळ्यात जानवे परिधान केले आहे आणि ते काढावयास लावणे हे अत्यंत अपमानकारक असून आम्ही त्याचा निषेध करतो, असे सांगितले.
शिमोगा, बिदर वगैरे ठिकाणी सीईटी परीक्षा देण्यास गेलेल्या ब्राह्मण विद्यार्थ्यांना गळ्यातील जानवे काढावयास सांगून त्यांची अडवणूक करण्यात आली ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. यामागे एक मोठे षडयंत्र आहे. परीक्षेवेळी गैरफायदा घेतला जाऊ नये या उद्देशाने मागे परीक्षा केंद्रात बुरखा घालून जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्या मुद्द्याला धरून ही चुकीची कारवाई करण्यात आली आहे. हिंदू समाजामध्ये फूट पाडण्यासाठी सध्या शहरी नक्षलवाद्यांचा एक गट सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भाषिक वाद, प्रांतीय वाद निर्माण करणे असे प्रकार त्यांच्याकडून केले जात आहेत. एकंदर देशांमध्ये हिंदू समाज सौहार्दपूर्ण शांततेच्या वातावरणात राहू नये, असा त्यांचा प्रयत्न आहे. ब्राह्मण विद्यार्थ्यांना जानवे काढावयास लावणे हे त्यापैकीच एक ठरवून केलेले षडयंत्र आहे. आम्ही समस्त ब्राह्मण समाज आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे याचा निषेध करतो. संपूर्ण समाज संघटित झाला तरच राष्ट्र निर्मिती होते हे लक्षात घेतले पाहिजे. एका समाजाला दुखवून संपूर्ण समाज व्यवस्था डळमळीत, विघटित करण्याच्या अशा कृत्यांना आमचा तीव्र विरोध असेल. तेंव्हा ब्राह्मण विद्यार्थ्यांना जानवे काढण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकारने त्वरित कारवाई करावी. तसेच भविष्यात याची पुनरावृत्ती झाली तर फक्त राज्यच नव्हे तर देशभरात आम्ही आंदोलन छेडू, असा इशाराही यावेळी कांही ब्राह्मण समाज प्रमुखांनी दिला.