बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील गणेश विसर्जन मार्गात निर्माण होणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर श्री गणेशोत्सव महामंडळाच्या विकास कलघटगी आणि रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि चर्चा केली आहे. विसर्जन मार्ग मोकळा करण्यासाठी तानाजी गल्ली येथील रेल्वे फाटक बंद करण्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी महामंडळाने केली आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात सुमारे ३५० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत आहेत. गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनावेळी येणाऱ्या चित्ररथांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर श्री गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन तानाजी गल्ली येथील रेल्वे फाटक तात्पुरते बंद करण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी केली.
यावेळी बैठकीत कायमस्वरूपी बंद करण्याऐवजी गणेशोत्सव काळात पर्यायी गेट उभारून अन्य व्यवस्था करण्यासंदर्भात चर्चा झाली. मनपा, पोलीस विभाग आणि रेल्वे अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक बोलावण्याची विनंती महामंडळाने केली आहे .
कपिलेश्वर मंदिर भागातील रहिवाशांना रेल्वे फाटक बंद केल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच विसर्जनावेळी याचा फटका बसू शकतो.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महामंडळाच्या मागणीची दखल घेत आगामी दोन-तीन दिवसांत पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.