बेळगाव लाईव्ह :सध्याचे उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींनी पक्षांसाठी धान्य आणि पाणी ठेवण्याचा आगळा प्रेरणादायक उपक्रम राबविण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाल्यामुळे पक्ष्यांसाठी पाणी आणि आहार मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या परिसरात येणारे पक्षी पाण्याच्या शोधात भटकताना दिसत होते. त्यातून शाळेच्या परिसरातील झाडांवर पक्षांसाठी धान्य आणि पाणी ठेवण्याचा विचार त्यांच्या मनात आला.
त्याची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात विविध ठिकाणी पक्षांसाठी पाणी आणि धान्य ठेवून माणुसकीचा हात पुढे केला. यामुळे पक्षांना पाणी आणि आहार मिळवण्यास मदत झाली असून शाळा परिसरात त्यांचा किलबिलाट वाढला आहे.
या उपक्रमाला शाळेतील वर्गशिक्षक सिद्धेश्वर तुर्केवाडकर, राजु मुजावर, एस. एन. जाधव, गोविंद पाटील आदी शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापुरकर आणि माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील यांनी देखील मुलांना प्रोत्साहित केले.
या पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांनी लहान वयातच सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्व समजून घेतल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.