कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी विचारांच्या नेत्या गौरी लंकेश यांची हत्या करण्याचा कट बेळगाव येथेच शिजल्याचा अंदाज पोलिसांना आल्या नंतर बेळगाव पुन्हा एकदा एस आय टी च्या रडार वर आले आहे.
गेल्या २१ जून रोजी एस आय टी च्या पथकाने खानापूर येथील जंगलात मुख्य आरोपी परशुराम वाघमारे याला घेऊन येऊन तपास केला होता त्या नंतर पुन्हा एकदा एस आय टी ची विशेष टीम तपासासाठी बेळगावात दाखल झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गौरी लंकेश यांची हत्या आपणच केली आणि यासाठी बंदूक चालवण्यासाठी बेळगाव येथे प्रशिक्षण घेतले अशी कबुली अटकेतील आरोपी परशुराम याने दिली होती त्यावेळी पासून या केस मध्ये बेळगाव लिंक वाढले आहे. आता एस आय टी च्या अधिकाऱ्यांना बेळगाव आणि परिसरातील काही हिंदुत्ववादी संघटनांवर संशय आहे. याबद्दल तपास करण्यासाठी ते पुन्हा दाखल झाले असून अतिशय गुप्तपणे तपास सुरू करत असल्याची देखील शक्यता आहे.
स्वतः हत्येची कबुली दिलेला परशराम ज्या संघटनेशी संबंधात आहे त्या संघटनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर बारीक नजर ठेवण्यात आली आहे. त्यांच्या हालचाली, व्यवहार आणि इतर गोष्टी तसेच शस्त्रास्त्रे आणण्याचे मार्ग याचासुद्धा शोध घेण्यात येत आहे.
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश या पुरोगामी विचारधारेतील व्यक्तींच्या एकामागोमाग हत्या झाल्या. यामध्ये कलबुर्गी व लंकेश हे कर्नाटकातील असल्याने कर्नाटक सरकारने स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थात एस आय टी स्थापन केली. या पथकाने सिंदगी येथून ११ जून रोजी परशराम वाघमारे याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याने दिलेल्या जबानीत आपण केलेली हत्या कबूल केली आहे. हत्येपूर्वी त्याचे वास्तव्य बेळगाव भागात होते असे त्याने सांगितल्याने पोलीस अधिक मोठ्या प्रमाणात कामाला लागले आहेत. आता पोलिसांच्या हाती बेळगाव लिंक मधून काय मिळते हे तपास झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.
एस आय टी दुसऱ्यांदा तपास करते या बद्दल स्थानिक पोलिसांना जराही कल्पना नाही आहे याबबत गुप्तता पाळण्यात आली आहे.